Saturday, 18 January 2014

...आणि मराठी कविता रंडकी झाली!

आधुनिक भारतीयकवितेतील सर्वश्रेष्ठ कवी असे ज्यांचे सार्थ वर्णन करता येईल ते महाकवी नामदेव ढसाळ यांचे परिनिर्वाण झाले आहे. मराठी साहित्यात सुरु झालेले विद्रोहाचे पर्व ढसाळांच्या जाण्यामुळे मलूल झाले आहे. ढसाळांच्या अकाली एक्झिटमुळे आधुनिक भारतीय कवितेच्या ललाटावर लावलेली विद्रोहबिंदी बुधवारच्या पहाटेला नकळत गळून पडली आणि मराठी कविता रंडकी झाली असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
नामदेव ढसाळ म्हणजे  गोलपिठ्यावर अवतरलेले उजेडाचे झाड होते.मुंबईतील कामाठीपुऱयाच्या गल्लीबोळातील बेमुर्वत हवापाण्याला  फाट्यावर मारत लहानाचे मोठे झालेल्या ढसाळांनी मखमली शालजोडीत हरवलेल्या बुळबुळीत मराठी साहित्याला रांगडा मर्दानी चेहरा दिला. मस्तानिच्या मधुकर कंठातील पिकेचे कवन सदाशिव पेठेतील चौसोपी वाड्याच्या बंदिस्त आवारात गाणाऱया मराठी साहित्याला ढसाळांनी  जागतिक साहित्यविश्वाच्या विशाल प्रांगणात उभे केले. गोऱया चमडीच्या आणि गुलाबी ओठाच्या जुजबी सामानावर ज्ञानपीठाचे मुकुट हस्तगत करणाऱया मराठी साहित्याला ढसाळांच्या खरचटलेल्या बुल्लीचा दणका बसताच मराठी साहित्य झटक्यात गाभण राहीले. फुरफुरणाऱया शेंडीच्या तालावर झिंगणाऱया साहित्याला ढसाळांनी बेकारांचे, भिकांऱयांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे, दर्ग्यांचे आणि क्रुसांचे, कुरकुरत संभोग झेलणाऱया पलंगाचे, हिजड्यांचे,हातभट्टयांचे, स्मगलिंगचे, नागव्या चाकुंचे,अफुंचे साहित्य बनविले. ढसाळांनी खांडेकरी फडक्यात  कोंबलेले मराठी साहित्य पाब्लो  नेरुदाच्या शब्दांशी नाते सांगणारे, विश्वातील तमाम शोषीत, पीडित, कष्टकरी आणि कांतीकारी जनतेचा आवाज बनविले. गोलपिठानंतर, मुर्ख म्हाताऱयांने डोंगर हलविले, खेळ, पियदर्शिनी, तुही यंता कंची, या सत्तेत जीव रमत नाही, गांडुबगिचा, मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे,तुझे बोट धरुन मी चाललो आहे असे एकापेक्षा एक सरस कवितासंग्रह ढसाळांच्या लेखणीतून बहरत गेले. याशिवाय अंधारयात्रा हे नाटक, हाडकी हाडवळ, निगेटिव्ह स्पेस, आंधळे शतक या कादंबऱया,  मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे हा संकलित कवितासंग्रह अशी विपुल साहित्य संपदा ढसाळांनी निर्माण केली. ज्यावेळी ढसाळांची असामान्य प्रतिभा मराठी काव्याचे आणि मराठी साहित्य विश्वाचे मापदंड बदलून टाकत होती;त्याच वेळी त्यांच्या शब्दांवर, त्यांच्या प्रतिमांवर फिदा झालेला तरुण या कवितेत पेरलेले सुरंग हातात घेऊन मनुची सनातन दया उद्ध्वस्त करण्यासाठी आतूर होऊ लागला होता. आंबेडकरवादी चळवळीची चंद्रबिंदी लेवून दिमाखात मिरविणारे नेते जेव्हा छप्पन्न टिकली बहुचकपणा करु लागले; त्यावेळी ढसाळांची कविता तरुणांच्या रक्तात अगणित सूर्य पेटवू लागली होती. काँग्रेसचे अंगवस्त्र म्हणून वावरणाऱया पाणचट गवश्यांना आता रायरंदी हाडूकासारखे टाकून द्यावे हा विचार तरुणांच्या हाडीमाशी खिळू लागला. मेंदूच्या ठिकऱया उडविणारे अत्याचार, रिकाम्या पोटांचे आकोश, मरणाच्या खस्तांचे उमाळे उद्याच्या चिंतांचे धुमसणे यातून एक नविन युध्दघोष निर्माण झाला, त्याचे नाव दलित पँथर!
आतापर्यंत कवितेच्या शब्दात बंदिस्त असलेला नामदेव आता आंबेडकरवादी चळवळीचा आवाज झाला होता. नामदेव ढसाळ आणि त्यांचे सहकारी राजा ढाले,ज.वि. पवार, उमाकांत रणधीर, विठ्ठलराव साठे, प्रा. अरुण कांबळे, गंगाधर गाडे यांसारख्या सळसळत्या तरुणाईने विद्रोहाचा एल्गार बुलंद केला. अमेरिकेतील ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलित पँथरची निर्मिती झाली. उद्ध्वस्त मानवतेवर केले जाणारे अत्याचार समाप्त करण्यासाठी तरुणांचा हा झंझावात गावाखेड्याच्या वेशीपर्यंत पोहोचला. अत्याचाराच्या विरोधात केवळ कथा - कविता लिहूनच नव्हे, भाषण ठोकूनच नव्हे तर रस्त्यावर उतरुनही आम्ही संघर्ष करु शकतो हे दलित पँथरने दाखवून दिले. या लढाऊ संघटनेच्या निर्मितीचे, बांधणीचे आणि लढ्यात झोकून देण्याचे श्रेय नामदेव ढसाळांचे होते हे इतिहासाने आपल्या हृदयात कोरुन ठेवलेआहे.
आंबेडकरवादी तरुणांच्या ऊर्जेला विधायक वळण देऊन दबल्या- पिडलेल्यांचा आधार म्हणून मान्यता मिळविलेल्या दलित पँथरचे पुढे  विघटन सुरु झाले. यामागची कारणे काहीशी राजकीय आणि काहीशी व्यक्तिगत स्वरुपाची आहेत. पँथरच्या चळवळीचे समिक्षण करण्याची ही वेळ नाही. परंतु या चळवळीच्या संस्थापकांपैकी एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या नामदेव ढसाळांचा या फाटाफुटीची अत्यंत जवळचा संबंध होता हे अमान्य करुन चालणार नाही. ढसाळांनी  साहित्यातून आपल्या उत्तुंग पतिभेचा अविष्कार घडविला.गोलपिठानंतरही त्यांनी आपल्या निर्मितीत सातत्य ठेवले त्यांच्या साहित्य कृतीचे विषय विविधांगी असले तरी त्या साहित्याचे मध्यवर्ती सूत्र विद्रोहाचे, परिवर्तनाचे आणि माणसाच्या जगण्या मरणाच्या संघर्षाला बळ देण्याचे होते. साहित्यात त्यांनी दाखविलेले सातत्य ते आपल्या राजकीय विचारात दाखवू शकले नाहीत. आंबेडकरवादी तत्वविचाराला धरुन त्यांनी पँथरच्या निर्मितीचा पाया रचला. मात्र पुढे त्यांना आंबेडकरवादी तत्वविचार अपुरा वाटू लागला.यासाठी त्यांनी या तत्वविचाराला मार्क्सवादाची फोडणी देण्याचा पयत्न केला. मार्क्सवादी विचार हा सुद्धा मर्यादीत स्वरुपाचा का होईना परंतु परिवर्तनवादी असल्यामुळे त्यांचे मार्क्सवादाकडे आकर्षित होणे एकवेळ समजु शकते. परंतु त्यानंतर  ढसाळांनी अनेक धक्कादायक राजकीय  निर्णय घेतले.``शेठ सावकारांची आय झवून टाकावी'' म्हणणारा नामदेव शेठ सावकारांच्या दारांचे उबरठे झिजवू लागला. ``तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी, त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी,'' म्हणणारा नामदेव आणीबाणीचे समर्थन करु लागला. 1975 च्या दरम्यान दलित पँथरवर एकूण 360 खटले दाखल झाले होते. यापैकी बहुतांश खटल्यांमध्ये नामदेव ढसाळांना आरोपी करण्यात आले होते. यातुन सुटका मिळविण्यासाठी ढसाळांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन त्यांचे गुणगान करणारे काव्य लिहिले. ``चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे''म्हणणारा नामदेव शिवसेनेच्या भगव्यात रंगून गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारात दाखल झाला. ढसाळांचे एकूणच राजकीय वर्तन धरसोडीचे राहीले. यामुळे साहित्याचा ग्रुधकूट पर्वत असलेला हा महाकवी राजकारणाच्या कनातीत आपली ओळख हरवून बसला. साहित्यिक क्षेत्रातील प्रगल्भता आणि प्रतिभा ढसाळांना राजकीय क्षेत्रात दाखविता आली नाही याचे मुख्य कारण त्यांचा पिंड राजकीय नव्हता हे आहे. आंबेडकरवादी समाजविश्वात व्यक्तीची ओळख त्याच्या राजकीय भूमिकेवरुनच ठरविली जाण्याचा अनिष्ट पायंडा पडला आहे. उत्तुंग साहित्यिक प्रतिभा असलेले साहित्यिक, अद्वितीय कर्तृत्व असलेले कलाकार, गायक, कवी, प्रशासक इत्यादी सर्वांना आंबेडकरवादी समाज त्यांच्या राजकीय भूमिकेच्या तराजूनेच मोजतो. यामुळे इच्छा असो किंवा नसो आंबेडकरवादी समाजातील लेखक, कवी, कलाकार, प्रशासक यांना राजकीय भूमिका घेणे भाग पडते. मूळ प्रवृत्ती आणि व्यावहारिक लादलेपण यातील संघर्षात व्यक्तीच्या कार्याचे खरे मूल्यमापन दडपले जाते. ढसाळांच्या बाबतीतही काहीसे असेच झाले आहे. त्यांचे राजकीय धोरण काहीही असले तरी त्यांची साहित्यिक उंची वादातीत आहे. सामाजिक आणि साहित्यिक पांतात त्यांनी दिलेले डोंगराएवढे योगदान पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करीत राहिल हे निश्चित. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

No comments:

Post a Comment